मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा: अशोक चव्हाण

 

मुंबई: मराठा आरक्षणावरील (Maratha Reservation) स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी केलेय. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाला संविधानिक संरक्षण देण्यासाठी केंद्रानं प्रयत्न करावेत, असं अशोक चव्हाण म्हणाले. 

आरक्षणाच्या विषयावंर भूमिका घेण्यासाठी केंद्राला संधी

मराठा आरक्षणाची 25 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारची आणि वकीलांची 11 तारखेला दिल्लीत वकीलांची बैठक आहे. मी स्वतः त्या बैठकीला दिल्लीत जाणार आहेत. मराठा आरक्षण उपसमितीतील सहकारीही या बैठकीला हजर राहतील.राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे यासाठी केंद्र सरकराचे सहकार्य अपेक्षित आहे. मागील सुनावणीत अटर्नी जनरलला नोटीस काढण्यात आलेली आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षण, EWS बाबत न्याय प्रविष्ठ प्रकरणांवर भूमिका घेण्यासाठी केंद्र सरकारला सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारनं केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळं राज्य सरकारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करण्याचा आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारनं याबाबतीत कोणताही खुलासा किंवा पुढाकार घेतलेला नाही. परतुं, त्यांच्याकडे आता ही संधी आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानंचं नोटीस काढल्यामुळे त्यांना सकारात्मक गोष्टी करता येतील. 

केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अर्ज करावा

केंद्र सरकारनं आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज करावा. एसईबीसी आरक्षण, तामिळनाडूचं आरक्षण, ईडबल्यूएस आरक्षण याच्यांबाबत कोर्टात प्रश्न प्रलंबित आहेत. या तीन आरक्षणापैकी फक्त मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. केंद्र सरकारनं याचिका दाखल करुन मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या खंडपीठापुढं व्हावी

50 टक्के आरक्षणाची मर्यादा इंद्रा सहानी केसमुळे लागली आहे. मात्र, इंद्रा सहानी प्रकरणाला 30 वर्षे झाली. आता 30 वर्षानंतर त्या निकालाचं पूनर्विलोकन करावं. इंद्रा सहानी 30 वर्षापूर्वीचा विषय आहे. इंद्रा सहानीचा निकाल 9 न्यायाधीशांच्या बेंचनं घेतला. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी 9 किंवा 11 जणांचं बेंच असावं, अशी आमची इच्छा आहे. सध्याचं बेंच 5 न्यायाधीशांचं आहे. त्यामुळे इंद्रा सहानी केसचा निर्णय बदलू शकत नसल्यानं 9 किंवा 11 न्यायाधीशांच्या बेंचपुढे सुनावणी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचंही चव्हाण म्हणाले.

तामिळनाडू प्रमाणं संविधानिक संरक्षण द्यावं

तामिळनाडूच्या आरक्षणाला राज्यघटनेच्या 9 व्या अनुसूचीचं संरक्षण आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला 9 व्या शेड्यूलमध्ये घालून संरक्षण देण्याबाबत प्रयत्न करावेत,अशी मागणी केंद्र सरकारकडे आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, येत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार आहे.