प्रशासनाला जागं करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पत्रीपुलाजवळ हातात बॅनर घेऊन निषेध आंदोलन केले.


कल्याण : वाहतूक कोंडीत नागरिक दोन-दोन तास अडकून राहतात. आम्ही तर 24 तास या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत आहोत, असं सांगत कल्याणमधील स्थानिकांनी आज प्रशासनाविरोधात आंदेलन केलं. प्रशासनाला जागं करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पत्रीपुलाजवळ हातात बॅनर घेऊन निषेध आंदोलन केले. तसेच, यापुढे तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला.


कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत सध्या नागरिक वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करत आहेत. कल्याण शिळफाटा रस्ता, कल्याण श्रीराम चौक रस्ता, कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्रीपुलावर होणारी वाहतूक कोंडी, वालधुनी, रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.




एकीकडे, जुन्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरु असतानच प्रशासनाकडून कल्याण पूर्वेतील पुलाजवळील रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हा रस्ता पूर्णपणे बंद असल्याने पत्रीपुलाच्या रस्त्यावर संपूर्ण ताण येत आहे. डोंबिवली कडून 90 फुटी रस्त्यावरुन येणारी वाहनं, दुसरीकडे कल्याण शिळ मार्गावरुन येणारी वाहने यामुळे पत्रीपुलावर तासांतास वाहनचालक आणि नागरिक अडकून राहतात. याचा जास्त फटका पत्रीपुलाजवळील स्थानिक नागरिकांना बसत आहे.


रस्त्यावर होणारी ट्राफिक आणि उडणारी धूळ यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याविरोधात स्थानिक भाजपा नगरसेविका रेखा राजन चौधरी यांच्या नेत्तृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. नागरिकांच्या हातात समस्या मांडणारे फलक होते. आमच्यामुळे इतरांच्या त्रासात भर पडू नये त्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. 90 फुटी रस्त्याचे अर्धवट काम आणि पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही, तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.