पुन्हा दहा दिवसांकरिता कडक लॉकडाऊन

पुन्हा दहा दिवसांकरिता कडक लॉकडाऊन



ठाणे :


 ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवलीत पुन्हा दहा दिवसांकरिता कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे.  ठाण्यातील बाळकुम, कोलशेत, ढोकाळी परिसरातील रहिवाशांनी कोरोना रोखण्याकरिता उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला असून किराणा दुकाने, भाजीपाला बंद केला आहे. अन्य ठाणेकरांनी याचेच आचरण करावे, अशी महापालिका प्रशासनाची अपेक्षा आहे. मात्र सर्वत्र हे अशक्य दिसत असल्याने सोमवारी दिवसभर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा व पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कडक लॉकडाऊनचा निर्णय झाला.


पोलीस आयुक्त फणसळकर यांनी तसे टिष्टुट दुपारी केले. मात्र त्यानंतर अनलॉक-दोनचे वारे देशभर वाहत असताना व पुनःश्च हरीओमचा गजर सुरु असताना एवढा कडकडीत लॉकडाऊन पाळण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नापसंती व्यक्त केली. त्यामुळे लागलीच पोलीस आयुक्तांनी आपले टिष्टुट मागे घेतले व कंटेनमेंट झोनमधील निर्बध कडक करण्याचाच विचार सुरु असल्याचे सांगून लॉकडाऊनबाबतचा गोंधळ वाढवला.


मंगळवारी पुन्हा बैठकांचा रतीब घातल्यावर महापालिका आयुक्तांनी २ जुलै ते १२ जुलै लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. राज्यातील लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत लागू असल्याने त्या आदेशाच्या अनुषंगाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील, असे आदेशात नमूद केले असले तरी प्रत्यक्षात अनेक प्रभागात महापालिका कर्मचारी व पोलीस फिरुन किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांनी परवापासून दुकाने सुरु ठेवू नका, असे आवाहन करत आहेत.