जिल्हाधिकाऱ्यांसह तब्बल ७२० अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या महामारीत कार्यरत
ठाणे
मुंबई महापालिकेलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यात देशात सर्वाधिक सहा महापालिका आहेत. यामुळे येथील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने या महापालिका प्रशासनाचे अधिक महत्त्व आहे. जिल्ह्यातील शहरांमधील नागरिकांना फारसे महत्त्व नसलेले व काहींना तर तोंडओळखही नसलेल्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने विविध आदेश व नियमांद्वारे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस व आरोग्य यंत्रणेला तैनात व सतर्क ठेवून जिल्ह्यातील नागरिकांच्या पालकत्वाची जबाबदारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह तब्बल ७२० अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या या महामारीत पार पाडत आहेत.
कोरोना या महामारीच्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव व त्यांच्या संपूर्ण हिताची, सुरक्षेची कामे सक्तीने करून घेत नागरिकांच्या हिताची भूमिका पार पाडणाऱ्या जिल्हाधिकारी' प्रशासनाची जाणीव या सक्तीच्या संचारबंदीत नागरिकांना झाली आहे. या महामारीतून नागरिकांना वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह योद्धे म्हणून डॉक्टर्स आणि त्यांचा कर्मचारी वर्ग, पोलीस यंत्रणा, सहामहापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका-नगरपंचायती प्रत्येकी दोन आदी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारीवर्ग नागरिकांचा कोरोनाच्या महामारीतून बचाव करीत आहेत. याशिवाय जिल्हा निबंधकांच्या नियंत्रणातील एपीएमसी सारख्या अन्नधान्य, भाजीपाल्याच्या बाजार समित्या, पुरवठा विभागांचे योद्धे कर्तव्य निष्ठेने तत्पर आहेत. लॉकडाउन हटवण्याच्या मागणीवरून, प्रवासी गाड्या सोडण्यासाठी, अन्य राज्यातील, जिल्ह्यातील अडकलेल्यांना येण्या-जाण्याची परवानगी मिळवण्यासाठी या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यंत्रणेची ओळख व तिचे महत्त्व सामान्य नागरिक व गरिबातील गरिबांना झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. तर मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याच्या परवानगीसाठी तर अक्षरश: देव पाण्यात ठेवण्यात आले आहेत.