कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कल्याण
येथील आधारवाडी डम्पिंगवरील कचऱ्यात उन्हाच्या तडाख्यामुळे मिथेन वायू तयार होऊन तेथे आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. लॉकडाउन ही कचरा वर्गीकरणाची संधी समजून कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने सक्ती केली आहे. आधारवाडी डम्पिंगला शनिवारी लागलेल्या आगीमुळे कचरा वर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वर्गीकरण केल्यास कचरा डम्पिंगवर जाणार नाही. त्यामुळे आग लागणार नाही, याकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष वेधले आहे.
कचरा वर्गीकरण करण्यास सांगितले तर लॉकडाउनमध्ये डस्टबीन नाही, कामगार येत नाहीत, वेळ नाही अशी कारणे नागरिक देतात. मात्र, हेच लोक कचरा न उचलला गेल्यास प्रशासनाच्या नावाने खडे फोडतात. कोरोनामुक्तीप्रमाणेच शहर कचरामुक्त व डम्पिंगमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन महापालिकेस सहकार्य करावे. कचरा वर्गीकरण झाल्यास डम्पिंगवर कचराच न गेल्याने डम्पिंगला आग लागणारच नसल्याचे उपअभियंता मिलिंद गायकवाड म्हणतात.
कचरा वर्गीकरण सक्तीची ही वेळ नाही महापालिका हद्दीत कचरा वर्गीकरणाची सक्ती केल्याने कचराकुंड्या हटविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. कचरा वर्गीकरण करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात सक्ती करण्याची ही वेळ नाही, असे मत शिवसेना नगरसेवक सचिन बासरे यांनी व्यक्त केले.