आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल


आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

 


 

नवी मुंबई: 


पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाने चोर समजून तिघांची हत्या केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर काही राजकिय पक्ष व संघटनांनी सदरची हत्या ही विशिष्ट वर्गाने केल्याचा आरोप करून या घटनेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे प्रकरण बरंच तापलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सदर हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या शंभरहून अधिक लोकांना अटक करून त्यात कुणीही विशिष्ठ वर्गातील व्यक्ती सहभागी नसल्याचे उघडकीस आणले आहे. मात्र त्यानंतर देखील खारघर येथे रहाणाऱ्या तृप्ती जयवंत देसाई या महिलेने पालघर येथील साधूंच्या हत्येचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर शेअर करुन महाराष्ट्र सरकारने याचे उत्तर द्यायलाच हवे, अशी पोस्ट टाकली आहे. 

पालघर येथे जमावाकडून झालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाच्या हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण देशात राजकीय वातावरण तापलं असताना, खारघरमध्ये रहाणाऱ्या एका महिलेने पालघर येथे घडलेल्या झुंडबळीच्या घटनेचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर शेअर करून दोन वर्गांमध्ये शत्रुत्व व द्वेशभाव निर्माण करण्याचा तसेच महाराष्ट्र शासनाची बदनामी करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खारघर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.