पुढील सूचना मिळेपर्यंत कोणताही राजकीय,क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमाला परवानगी नाही- मुख्यमंत्री
मुंबई -
दिल्लीत जे घडले ते महाराष्ट्रात होऊ दिलं नाही. राज्यात परवानगी मागण्यात आली पण कोरोनामुळे ही परवानगी नाकारली. जे दिल्लीतून राज्यात आले त्यांची यादी मिळाली यातील १०० टक्के लोकांचा शोध घेतला आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं आहे. येत्या काही दिवसात पुढील सूचना मिळेपर्यंत महाराष्ट्रात कोणताही राजकीय,क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
कोविड १९ सारखा आणखी एक व्हायरस समोर येत आहे. नोटांना थकी लावून व्हिडीओ पसरवले जात आहेत. जर कोणी जाणूनबुजून अफवांचे व्हायरस पसरवत असाल तर खबरदार, तुम्हाला सोडणार नाही. जनतेला मी कोविड पासून वाचवेन पण तुम्हाला कायद्यापासून कोण वाचवणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, देश कोणताही असो, जातपात धर्म कोणताही असो शत्रू एकच आहे. नाईलाजास्तव घरात राहावंच लागणार आहे. अनेक धर्मगुरु, मौलवी यांच्याशी चर्चा सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने आवाहन करत आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार आहे. पण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काळजी घ्यायला हवी असं त्यांनी सांगितले.
तसेच कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. ५१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेलेत. दुर्दैवाने काही मृत्यू झालेत यात वृद्ध, आजारी व्यक्ती यांचा समावेश आहे. आपल्या घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. त्यांच्यापासून अंतर राखणे, घराबाहेर जाऊ नये, हात स्वच्छ करुन त्यांची सेवा करा. सर्व देशात हीच काळजी घेतली जात आहे.