दिवाळीपर्यंत नागरिकांना गोड बातमी मिळेल, ऊर्जामंत्र्यांचे संकेत


मुंबई : “राज्यातील वाढीव वीजबिलासंदर्भात आम्ही सात वेळा रिपोर्ट पाठवला आहे. त्यासाठी अर्थखात्याला फाईल दिली आहे. येत्या दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी मिळेल,” असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.


“आम्हाला मातोश्रीवरुन फोन आला आहे. त्यामुळे वीज बिलासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ. यााबाबतची फाईल वित्त विभागाकडे गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी होते. पण आता ते बरे झाले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेऊ,” असेही नितीन राऊत यांनी सांगितले.




“0 ते 100 युनिटपर्यत वीज फ्री देण्याबाबत मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे. मात्र त्यावर अर्थमंत्री म्हणून अजित पवार बोलतील. तसेच माझ्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच मी त्यावर आणखी योग्य भाष्य करेन. यंदा दिवाळीत नागरिकांना नक्कीच सप्रेम भेट मिळेल,” अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली.


मुंबईकराना प्रीमियम वीज देण्याचा मानस


“राज्याचे ऊर्जा खातं माझ्याकडे आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात 0 ते 100 युनिटपर्यंत फ्री वीज पुरवठा केला जाईल. आम्ही वीज उत्पादन शुक्ल कमी करु. तसेच आमच्या तीन कंपन्यांमध्ये अॅडवान्स टेक्नॉलॉजी आणू. जवळपास 4 तास तरी शेतकऱ्यांना कुठलाही अडथळा न येता वीज पुरवठा केला जाईल. तसेच अनेक ठिकाणी आम्ही सोलार पॅनलला प्राधान्य देत आहोत,” असेही नितीन राऊत यांनी सांगितले.


“यासाठी आम्ही अनेक MOU साईन केले आहेत. मात्र आपले वीजदर पाहून अनेक इंडस्ट्री येत नाही. मुंबईला वीज पुरवण्यासाठी टाटा कंपनी पुढे आली आहे. हे टाटा युनिट मल्टिपल युनिट आहेत. मुंबईकराना प्रीमियम वीज देण्याचा मानस 1 वर्षात पूर्ण होईल,” असेही नितीन राऊतांनी सांगितले.


मुंबईत वीज गायब प्रकरणी तांत्रिक समिती अहवाल सादर 


“गेल्या 12 ऑक्टोबरला मुंबई अंधारात का गेली? त्याचा कारणांचा शोध घेण्यासाठी मी हा दौरा करत आहे. माझ्या खात्याची समिती सुद्धा याबाबत टेक्निकल गोष्टीचा शोध घेत आहे, यापुढे मुंबईकरांवर अशी वेळ येणार नाही. येत्या 2030 पर्यंतचा माईल स्टोन ठेवला आहे की वीज पुरवठा आणखी कशाप्रकारे वाढू शकतो. मुंबईला 24 तास वीज सातत्याने खात्रीची कशी देता येईल, याचे प्रयत्न सुरु आहेत,” असेही ते यावेळी म्हणाले.


“मी वीज गायब झाल्याने शंका व्यक्त केली होती. त्यावर तांत्रिक समिती अहवाल काल आला आहे. तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल. तसेच मी जी तांत्रिक समिती नेमली होती, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.” असेही नितीन राऊतांनी यावेळी सांगितले.