कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठाण्यात पाठवले तीन अधिकारी
ठाणे
माहिती तंत्रज्ञान संचालक रणजित कुमार, वस्तू आणि सेवाकर सहआयुक्त अमित सैनी या दोन सनदी सेवेतील, तर भारतीय महसूल सेवेतील शंटेश्वर स्वामी या तीन सनदी अधिकाऱ्यांना ठाण्यात पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. ठाणे पालिकेत ठाण्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात हतबल ठरलेल्या महापालिका प्रशासनाच्या मदतीसाठी मुंबईच्या धर्तीवर हे अधिकारी ठाणे पालिकेला मदत करतील.ठाण्यातील करोनाच्या उद्रेकाने सरकारची चिंता वाढविली आहे. जिल्ह्य़ात १२ हजार ४६४ करोनाबाधित असून शहरात दररोज १०० ते १२५ रुग्ण वाढत आहेत. तसेच शहरातील २७७ करोना प्रतिबंधित क्षेत्रांत करोनाचा संसर्ग अधिक आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये खाटा मिळणेही कठीण जात आहे.
करोना संक्रमण रोखण्यात पालिका प्रशासन हतबल ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त करीत पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्यासह प्रशासनास धारेवर धरले होते. एवढेच नव्हे दोन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्याही के ल्या होत्या. परंतु करोना बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची दखल घेत तीन अधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.ठाण्यात पालिका प्रशासनाच्या मदतीसाठी तीन अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.