२४ तासांच्या सवलतीनंतर घोडबंदर परिसर अवघ्या पुन्हा पूर्ण बंद
ठाणे :
घोडबंदर परिसरात सलग चार दिवस संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी येथील टाळेबंदी शिथिल करण्यात आल्याने लोकांनी भाजी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर भागातील भाजी विक्रेते त्या भागात कडक टाळेबंदी असल्याने घोडबंदर येथे येऊन भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत. हातावर पोट असलेले अनेक विक्रेते शहरातील ज्या भागात टाळेबंदी नाही तेथे जाऊन व्यवसाय करताना दिसत आहेत. असे असताना कापूरबावडी येथे भाजी विक्री करणाऱ्या तिघांना करोनाची लागण झाल्याचे मंगळवारी रात्री स्पष्ट झाले. हे तिघेही विक्रेते वागळे इस्टेट परिसरात वास्तव्यास आहेत. या तिघांना लागण होताच खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने कापूरबावडी परिसरात बुधवारी सकाळपासून जोरदार रुग्णशोध मोहीम सुरू केली. या भागातील अन्य काही भाजी विक्रेत्यांनाही लागण होऊ शकते, या भीतीने काहींचे विलगीकरणही करण्यात आले. टाळेबंदीतील नियमांची अंमलबजावणी करताना पालिकेच्या पातळीवर सावळागोंधळ अजूनही कायम आहे. संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या लढय़ातील अनेक आघाडय़ांवर ठाणे महापालिका प्रशासन धास्तावल्याचे चित्र आहे. कापूरबावडी भागात तीन भाजी विक्रेत्यांना करोनाची लागण झाल्याच्या घटनेनंतर कापूरबावडी ते गायमुखपर्यंतचा संपूर्ण घोडबंदर परिसर अवघ्या २४ तासांच्या सवलतीनंतर गुरुवारपासून पुन्हा पूर्ण बंद करण्याचा अजब निर्णय आयुक्त विजय सिंघल यांनी बुधवारी सकाळी घेतला.