महावितणाच्या अजब कारभारामुळे ठाण्यातील व्यापाऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट
ठाणे :
देशात करोना विषाणूचा संसर्ग वाढू लागन्याने २३ मार्चपासून देश लॉकडाऊन करण्यात आला. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे दिड महिन्यापासून ठाण्याच्या बाजारपेठांमधील इतर सर्व दुकाने बंद आहेत. दुकाने बंद असल्याने ठाण्यातील व्यापाऱ्यांसमोर आर्थिच पेच निर्माण झाला असून अशा स्थितीत व्यापाऱ्यांना दुकानांमध्ये काम करणाऱ्या मजुरांनाही पगार द्यावा लागत आहे. असे असले तरी महावितणाच्या अजब कारभारामुळे ठाण्यातील व्यापाऱ्यांसमोर आता नवे आर्थिक संकट उभे राहीले आहे. टाळेबंदीच्या काळात मीटर रिडींग घेणे शक्य नसल्याने महावितरणाने वर्षभराच्या वीज वापरानुसार सरासरी एप्रिल महिन्याची वीज देयके आकारणी सुरु केली आहे.
दुकाने बंद असणाऱ्या व्यापाऱ्यांना या सरासरी देयक आकारणीचा मोठा फटका बसला असून गेल्या महिन्यभरात वीजेचा कोणताही वापर केला नसला तरी व्यापाऱ्यांना ५ हजार ते ५० हजारापर्यंत वीज देयके महावितरणाकडून पाठवण्यात आली आहेत. अधिच व्यावसाय बंद असल्याने आर्थिक नुकसान होत असताना या वीज बिलांमुळे व्यापाऱ्यांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ही वीज देयके मागे घेऊन वीज वापारानुसार देयके आकारावीत, अशी मागणी ठाणे सुभाष पथ व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने महावितरणाकडे केली आहे. तसेच टाळेबंदीमुळे व्यापार ठप्प असल्याने ही वीज देयके भरताना उशीर झाल्यास दंड आकारू नये, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे.