कोरोना संकटाविरुद्ध सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देऊ-- एकनाथ शिंदे

कोरोना संकटाविरुद्ध सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देऊ-- एकनाथ शिंदे

 


 

ठाणे

सध्या कोरोना विषाणूशी लढाई आपण लढत आहे. सर्वत्र युद्ध पातळीवर कोरोनाशी लढण्याची सज्जता करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून शासनास सहकार्य करावे. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटीबद्ध आहे. ठाणे जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कोरोना संकटाविरुद्ध सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देऊ या  असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 

ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे, हे प्रमाण रोखण्याच्या दृष्टीकोनातून व सद्यस्थीतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, महापौर नरेश म्हस्के,महापालिका आयुक्त विजय सिंघल, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करीत असलेले सर्व डॉक्टर्स उपस्थित  होते.

 

या बैठकीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना व्हायरसचा फैलाव हा प्रामुख्याने एकमेकांच्या संपर्कातून होत असल्याने सोशल डिस्टान्सींगला  सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे व याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसून येत असतील अशा सर्वांनी स्वत: पुढे येवून तपासणी करुन घेणे आवश्यक आहे तर आणि तरच आपण या आजाराची साखळी तोडून यातून मुक्त होवू शकतो. ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशा व्यक्तींचे नातेवाईक व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात यावी, तसेच कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात रुग्णालयांची संख्या वाढवून यामध्ये आवश्यक असलेले डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी उपलब्ध  करुन त्यांना आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन त्यांची निवास व भोजन व्यवस्था योग्य प्रकारे राहीत याकडे कटाक्षाने लक्ष राहील अशा सूचना पालकमंत्री एकनाथ  शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या. ठाणेकर नागरिकांनी आजवर जो  संयम दाखवून प्रशासनास जे सहकार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यकत करीत कोरोनाचे सावट दूर होईपर्यत असेच सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.