“मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेले हे रुग्णालय अनेकांना दिलासा देणार ठरू शकते.
विशेष म्हणजे सीएएसआर फंडातूनही हे काम होईल, प्रसाद लाड यांचा विश्वास
मुंबई :
मुंबई महापालिकेच्या सध्या बांधून तयार असलेल्या परळमधील महात्मा गांधी रूग्णालयात क्वारंटाइनसाठी व्यवस्था करण्यात यावी. महापालिका किंवा राज्य सरकारला शक्य नसेल तर 'सीएसआर च्या माध्यमातून आम्ही सारी व्यवस्था करू. मात्र, राज्य सरकारने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. या मागणीचे पत्र आमदार लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी दिले आहे. या संदर्भात आमदार लाड यांनी `सरकारनामा'ला माहिती दिली.
ते म्हणाले, " सुमारे चारशे कोटी रूपये खर्च करून हे रूग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र, सध्या ते रिकामे आहे. एकूण तीनशे रूग्णांची सोय या रुग्णालयात होऊ शकते. यातील बाह्यरूण विभाग सुरू ठेऊन उर्वरित जागेत दोनशे जणांना क्वारंटाइन करणे शक्य आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्यता दिली तर आम्ही सीएसआरच्या माध्यमातून धर्मदाय संस्थांच्या मदतीने तातडीने रूग्णालयात क्वारंटाइनची व्यवस्था करू शकतो. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णालवर उपचार करण्याइतकेच लागण होऊ नये म्हणून संशय असणाऱ्या किंवा परदेशातून आलेल्या नागरीकांना क्वारंटाइन करणे तितकेच आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत याची निकड आहे. तेथील परिचारिका व इतर स्टाफही या कामासाठी तयार आहे. या साऱ्या परिस्थितीची विचार करून मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारे सीएसआर' च्या माध्यमातून रूग्णालय वापरण्यास परवानगी दिली तर आम्ही तातडीने पुढील कार्यवाही करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.