भिवंडी मेट्रो मार्गबदलासाठी फेरसर्वेक्षणाचे नगरविकासमंत्र्यांचे आदेश
मूळ आराखडय़ाप्रमाणे मेट्रो उभारण्याची भाजपची मागणी
ठाणे
ठाणे, भिवंडी आणि कल्याण या मेट्रो मार्गाचे आरेखन नागरिकांच्या तक्रारीनंतर बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दोन महिन्यांपूर्वी दिले असतानाच, त्याला भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी विरोध केला आहे. मूळ आराखडय़ाप्रमाणेच भिवंडी मेट्रो मार्ग करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे मेट्रो मार्गावरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून या वादात मेट्रो प्रकल्पाचे काम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही शहरांना जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीत बांधकामांचा अडसर ठरत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. या प्रकल्पासाठी भिवंडी शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा धामणकर नाका उड्डाणपूल पाडावा लागणार असल्याचा निष्कर्ष प्राधिकरणाने काढला आहे. या प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात बांधकामे बाधित होणार असून या नागरिकांकडून मेट्रो मार्गाचे आरेखन बदलण्याची मागणी होत होती. त्याचप्रमाणे कल्याणमधून जाणारा मेट्रो मार्गही दुर्गाडीहून थेट एपीएमसीला नेण्याऐवजी बिर्ला कॉलेजमार्गे नेण्याची मागणी होत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने या मार्गाचे आरेखन बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र या सर्वेक्षणास भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी विरोध केला आहे.