प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्यास हे सरकार कटिबद्ध- मुख्यमंत्री
मुंबई
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात गिरणी कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. हा कामगारच उपरा होणार असेल तर मुंबई का मिळवली, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्यास हे सरकार कटिबद्ध असून एकही कामगार बेघर राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्याचबरोबर पूर्वजांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई घरे विकून गमावू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगारांच्या वारसांसाठी ३ हजार ८९४ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबई उपनगर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
म्हाडातर्फे काढण्यात आलेल्या या सोडतीमधील सदनिकांच्या किमती साडेनऊ लाख रुपये एवढय़ा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गिरणी कामगारांसाठी पुढील टप्प्यात ठाणे जिल्ह्य़ातील रांजणोली गावात एमएमआरडीएने बांधलेल्या १ हजार २४४ सदनिकांची सोडत १ एप्रिलला काढण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
‘मुंबईत परवडणारी घरे उभारण्याची प्रक्रिया अधिक वेगाने करण्यात येणार असून लवकरच ५० हजार परवडणारी घरे उभारणीचे उद्दिष्ट आहे. शासन कायमच गिरणी कामगारांच्या पाठीशी आहे,’ असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.