मुंबई-ठाण्यासह पुण्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद- मुख्यमंत्री
मुंबई:
राज्यात करोनाचे १७ रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जीम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. तसेच नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास विनाकारण करू नये, मॉलमध्येही जाणं टाळावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत करोनाबाबतचं निवेदन दिलं. राज्यात करोनाचे एकूण १७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दहा रुग्ण पुण्यातील आहेत. मात्र, या १७ रुग्णांमधील करोनाची लक्षणं गंभीर नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जिम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. करोनाचा राज्यात फैलाव नाही. मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुण्यातही नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. पुढचे १४ दिवस काळजी घ्यायला हवेत, म्हणून निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
रेल्वे आणि बसेस या अत्यावश्यक सेवा आहेत. त्यामुळे त्या बंद करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक अशी बंद करता येणार नाही. मात्र, नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये. कारण असेल तरच प्रवास करा, असं सांगतानाच मॉलमध्ये जाणंही नागरिकांनी टाळावं, असं आवाहन त्यांनी केलं. हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल बंद करण्यात आलेलं नाही. मात्र, लोकांनी या ठिकाणी जाणं टाळावं, असं सांगतानाच आम्हाला व्यवसायापेक्षा जनतेच्या जिवीताची काळजी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सध्या लग्न सराईचे दिवस आहे. मात्र नागरिकांनी लग्न समारंभामध्येही काळजी घ्यावी. गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी खासगी कंपन्यांनाही महत्त्वाच्या सूचना केल्या. खासगी कंपन्यांनी जिथे जिथे शक्य आहे, तिथे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच क्रिडा, सभा, मेळावे, समारंभ आदी गर्दीचे कार्यक्रम घेण्यात येऊ नये. या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना संबंधित शासनाकडून परवानगी देण्यात येणार नाही. ज्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या परवानग्या रद्द करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.