हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावावा-- वनमंत्री संजय राठोड
वंसतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम
ठाणे
हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा असे आवाहन राज्याचे वने,भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी केले. वंसतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत वनमहोत्सव राज्यस्तरीय शुभारंभ मौजे शीळ पनवेल रोड भंडार्ली ठाणे येथे मंत्री संजय राठोड,यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आला.यावेळी मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे़ ,उप वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वनमंत्री संजय राठोड म्हणाले की,भारतीवनस्पतींची वन सर्वेक्षण 2019 चे अहवालानुसार महाराष्ट्रात वनक्षेत्राचे प्रमाण हे 20.01% इतके असून हे प्रमाण भारताचे वनक्षेत्राचे प्रमाणात 8.65 टक्के इतके आहे भारतीय वन नीतीनुसार हे प्रमाण भौगोलिक क्षेत्राच्या ते 30 टक्के एवढे क्षेत्र असावे असे उद्दिष्ट राष्ट्रीय पातळीवर निश्चित आहे. या उद्दिष्टांची पूर्तता करण्याकरिता तसेच बदलत्या जागतिक वातावरणाचा समतोल राखण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे आवश्यक आहे .
महाराष्ट्रातील वनक्षेत्र वर्षभरात सुमारे 97500 हेक्टरने वाढ झाली आहे.ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. वृक्षलागवडीची चळवळ जोमाने पुढे नेण्याची आवश्यकता आहे त्याअंतर्गत 2020 ते 2024 या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी दहा कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प शासनाने केला आहे.
शासन वनक्षेत्र व्यतिरिक्त क्षेत्रावर सुद्धा विविध योजनांच्या माध्यमातून , वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत आहे. मागील तीन वर्षामध्ये वन विभागाने 50 कोटीचे वर वृक्ष लागवड करून या अभियानाला एका जन आंदोलनाचे स्वरूप दिले आहे. येत्या पाच वर्षामध्ये प्रत्येकी दहा कोटी असे पन्नास कोटी वृक्ष लागवड करण्याचा शासनाचा निर्धार असून त्याकरिता वन विभाग शासनाचे इतर विभागांच्या सहकार्याने प्रयत्नशील आहे.
राज्यातील वनक्षेत्र मर्यादित असल्याने वृक्ष लागवडीस तिथे कमी वाव आहे त्यामुळे वनेतर क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीस मोठ्या प्रमाणावर चालना देणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन पाच कोटी वृक्ष लागवड वन विभागाच्या माध्यमातून व उर्वरित पाच कोटी वृक्ष लागवड ग्रामपंचायत , राज्याचे सर्व प्रशासकीय विभाग तसेच केंद्र शासनाच्या राज्यातील आस्थापनांचे माध्यमातून करण्याचे प्रस्तावित आहे. सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये भाग घेऊन हरीत महाराष्ट्र घडविण्याकरिता आपले योगदान दयावे असे आवाहनही श्री राठोड यांनी केले.