वालधुनी आणि उल्हास नद्यांना प्रदुषण मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर करावा.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आज सभागृहात आग्रही मागणी
नवी दिल्ली
कल्याण लोकसभा मतदारंघातील वालधुनी आणि उल्हास नदी या दोन नद्या पाच शहरांमधून जात असून सुमारे ५० लाख नागरिकांच्या पाण्याची तहान भागवत आहेत, तसेच या नद्यांच्या पाण्याचा वापर पिकांसाठीही केला जातो. उल्हासनगर परीसरातून वाहणाऱ्या वालधूनी नदीत आजूबाजूच्या वस्तीमधून सांडपाणी सोडले जाते. अनेक टाकाऊ वस्तू व नदी परिसरातील काही कंपन्यांकडून रसायन मिश्रित पाणी नदीत राजरोसपणे सोडले जाते. यामुळे या दोन्ही नद्यांच्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्या असून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीतील पाणी तसेच नदीखालील भूस्तर प्रदुषित होत असून या प्रदुषित पाण्यामुळे नदीचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुध्दा दुषित होण्याचा मोठा धोका संभवत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. या दोन्ही नद्यांचे पुर्नजिवितकरण हा खूप खार्चिक भाग असून तो खर्च स्थानिक स्वराज्य संस्थांना परवडणारा नाही. १६ व्या लोकसभेपासून मी या दोन्ही नद्यांचे शुध्दीकरण तथा पुर्नजिवितकरण करावे, यासाठी अनेक वेळा हा गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित केला असून मागील अधिवेशन काळामध्ये देखील मी वालधुनी आणि उल्हास नदी या नद्यांच्या पुर्नजिवितकरण कामासाठी केद्र सरकारने निधी द्यावा मागणी केली होती, याकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील २१ नद्यांचे Mission for Clean Rivers in Maharashtra या मोहिमे अंतर्गत पुर्नजिवितकरण करण्याचे जाहीर केले असून माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या पुर्नजिवितकरणासाठी अनुक्रमे रु.५११ कोटी आणि रु.३७.५३ कोटी खर्च अपेक्षित असून केंद्र सरकारकडे सदर निधी मंजूरी करिता अहवाल पाठवला आहे. केंद्र सरकारने गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी नमामि गंगे च्या धर्तीवर वालधुनी आणि उल्हास नद्यांना पुर्नजिवितकरणाने प्रदुषण मुक्त करण्यासाठी निधी जलशक्ति मंत्रलयाने लवकरात लवकर मंजूर करावा, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली.