शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का; किरीट सोमय्यांचा सवाल

मुंबई: औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला आहे. शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचे उत्तर द्यावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सध्या राज्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरला असून त्या माध्यमातून शिवसेनेची कोंडी केली जात आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, ही शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र, आता काँग्रेससोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. तर काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.